आज भारतात राजकीय परिस्थिती अशी आहे की, प्रस्थापित सरकार बद्दल सर्वांचे मनात काही ना काही किंतु आहे. अनेक वा किमान काही बाबतीत सरकार बद्दल नाराजी, साशंकता आहे. परंतु पर्याय च उपलब्ध नाही.
आज विरोधी पक्ष संसदेमध्ये - राज्यसभा लोकसभा येथे सरकारच्या चुका उघड उघड करत आहे. न्यायालयांमध्ये सरकारविरोधी मुद्दे मांडतो आहे. अनेक स्तरावरती सरकारला त्याच्या चुका दाखवतो आहे.
विरोधी पक्ष म्हणून सत्तेवर असणाऱ्या सरकारला प्रश्न विचारणे हे त्यांचे कामच आहे. पण त्या बरोबरीनं स्वतःचे मत, स्वतःची भावी कार्यवाही, काही मूलभूत कार्यक्रम ही हेही विरोधी पक्षाने मांडले पाहिजेत. केवळ सरकारला प्रश्न विचारून, कात्रीत पकडणे पुरेसे नाही. आज काँग्रेस, आप, शिवसेना, समाजवादी पक्ष, सर्वच विरोधी पक्ष यात अपुरे पडताना दिसत आहेत.
सरकार चुका करत आहे अपूरे पडत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती देश कमकुवत बनताना दिसतो आहे. हे लक्षात आणून दिलेत मान्य! पण पुढे काय?
गोष्टी सुधारण्यासाठी काही नियोजन तुम्ही मांडू शकता का? त्या दृष्टीने काही विचारमंथन करता आहात का? संबंधित विचारवंत, अधिकारी व्यक्ती यांना एकत्र आणून भावी कालासाठी काही ठोस पर्याय देताय का? त्यासाठी काही प्रयत्न तरी करत आहात का? ते लोकांपर्यंत पोहोचवताय का?
केवळ सत्ताधारी पक्षाचे सत्ता कोलमडून पाडायला हे एक वेळ पुरेस आहे. पण पुढे काय, हा पर्याय ठोस आणि सकारात्मक पर्याय जोपर्यंत विरोधी पक्ष उभा करत नाही; लोकांपर्यंत पोहोचवत नाही; तोपर्यंत लोकांचा विश्वास विरोधी पक्ष प्राप्त करू शकणार नाही. भले लोकांचा सरकारवरचा विश्वास उडेल. पण मग कोणावरच विश्वास नाही अशी अराजकता निर्माण होईल.
अशीच परिस्थिती आज दिसते आहे. समाजातील विचारवंत, जाणते, अभ्यासक व कृतिशील लोकांनी पुन्हा एकदा पुढे यायला हवं. छोट्या छोट्या दुरुस्त्या - व्यवहार्य दुरुस्त्या सुचवायला हव्यात. आणि त्या लोकांना, त्यांच्या विचारांना, विरोधी पक्षांनी उचलून धरायला हवे.
असे राजकीय मंथन हे आजच्या काळाच्या भारताची गरज आहे.