Tuesday, March 3, 2015

सख्या रे ...२.कान्हा रे, नंद नंदन

( केदार रागातली एक चिज - कान्हा रे, नंद नंदन, " ऐकताना तीच ती राधा मला वेगळीच दिसली ती ही अशी... )

कान्हा, आणि तो दिवस आठवतो तुला?
मी पाणी भरायला निघालेले. अन अनयही बाजारात जायला निघालेला. आम्ही छान गप्पा मारत निघलेलो, अन अचानक कसा कोणजाणे विषय निघालाच .

अनय म्हणला , " पाणी भरून, लवकर जा घरी, आई ओरडत असते तुझ्या यमुनेवर रेंगाळण्याबद्दल..."

" का पण ? मी सारे काम उरकूनच येते ना? बसले जरा वेळ इथे तर काय झाल? तेव्हढच मन मोकळं होत रे माझं..."

" अग तसं नाही ग... मला काहीच नाही वाटत. पण आई उगाचच चिडते अन मारते न तुल. मग मला नाही बरं वाटत. मलाही लागतं ग ते..."

"हो आला मोठा माझी काळजी वाटणारा... सासुबाईंसमोर गप्प बसतोस ते रे ..." मी त्याचा हात धरून त्याला थांबवत म्हटलं

" असं नको ग बोलूस... तिच्यासमोर मी कधीच नाही बोलू शकणार, तुल माहिती आहे. पण म्हणून मला काही वाटतच नाही अस नाही न..."

खरं तर तो अगदी खरच बोलत होता, अगदी मनापासूनही... पण माझच चित्त थ-यावर नव्हतं. मला कळायच पण वळायचं नाही. अन मग आमची नेहमीची वादावादी सुरू व्हायची. आजही तसच झालं...

" काही नाही, तुझाही विश्वास नाही माझ्यावर..."

" राधे, हे असं नाहीये... तुला पक्क माहिती आहे. पुन्हा असं म्हणू नकोस ग..." असे म्हणून अनय तट्टकन उलटा फिरला अन बाजाराच्या दिशेने ताड ताड चालला गेला...

मी खाडकन जागी झाले, माझ्या मनातले बोलताना माझे भान हरवलेले... अनयला उगाचच दोष दिला मी....

कशी बशी यमुनेतिरी आले अन मट्टकन बसले.

चुकलच माझं. या सा-यात अनयची काहीच चूक नव्हती. पाठमो-या दूर दूर जाणा-या अनय कडे बघत त्याला साद घातली "अनय..."
मनातच म्हटलं, चुकले रे मी. तुला दुखवायचं नव्हतं मला....

अन मग माझ्या मनात दुखचे कढ भरभरून यायला लागले. मनात सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. अनेक वेळोवेळी तू माझी समजूत घातलेलीस. कितीतरी वेळा सगळा रोष स्वतावर ओढवून घेतला होतास. सासूबाईंनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना तूच योग्य ती अन माझी बाजू राखणारी उत्तरं दिली होतीस...सगळं सगळं आठवलं...

तुझ्याबद्दलच्या सा-या हळव्या भावना उचंबळून वर आल्या. सारा आसमंत भरून गेला; तुझ्या त्या समर्पणाच्या भावनेने. तुझी सारी घुसमट माझ्या समोर उभी राहिली. त्या क्षणी मला माझीच खूप खूप शरम वाटली. मी माझ्याच दुखात स्वताला वाहवते. तुझे दुख मात्र तू मनात अगदी आत ठेवतोस अनय. कसं कसं जमवतोस हे तू?

आता अनय आता दिसेनासा झाला. अन मग मी डोळे मिटले. डोळ्यातले सारे सारे सर्र्कन गालावर ओघळ्ले. "श्रीरंगा...." कधी मला माझ्या मनावर ताबा ठेवता येणार?

माझ्या मना वरच मी रागावले, मनाला म्हणाले,
" का रे, का छळतोस ?
किती उरापोटी आवरते मी.
अन तू असे वाहून घालवतोस?
आवरायला शीक रे, आवरायला शीक.
ठेवावे थोडे ओठात, पोटात अन उरातही ! "

अन डोळे उघडून बघितले.
तर कान्हा तू समोर उभा.... सारे सारे कळले असल्यासारखा उभा . किती समजतोस तू मला, माझ्या प्रत्येक गरजेला तू उभा असतोसच रे. मला समजावतोस, माझी प्रत्येक वेदना जणू तू भोगतोस.
इतकच नाही तर तिला हळूवार करून तुझ्या बासरीतून हळुवार बाहेर सोडून देतोस.
मला मोकळी करतोस दुखातून.
अन मला पुन्हा प्रेरणा देतोस नव्याने जगण्याची,....

कान्हा रे, नंद नंदन...
कान्हा रे...

No comments:

Post a Comment