Wednesday, February 19, 2014

"चल पुन्हा जागुयात !"

( एका महिला मंडळात दिलेल्या भाषणाचा मसुदा)

प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा टप्पा येतो , की ज्यावेळेस आपण आयुष्यात काय केल?, काय मिळवलं ? असा विचार आपण करू लागतो. प्रामुख्याने बायकांना हा विचार वयाच्या चाळीशी/ पन्नाशीला खुपच त्रास देतो. माझ्या पिढीपर्यंत तरी इथल्या बहुतांशी बायकांनी सर्वात महत्वाचा मानला तो संसार, मुलं-बाळ, नवरा अन असेच सगळे. जरी नोकरी, व्यवसाय, करियर केली असली तरी प्राधान्य होते ते संसाराला. मी आजूबाजूला बघते; अनेक बायका बघते, जेव्हा मुल मोठी होतात, स्वत:च्या पंखाने उडायला लागतात. अन त्यांचा सहचर आपल्या करियर मध्ये बुडून गेलेला असतो. अन अशा वेळेस या बायकांना खूप एकटेपणा, रितेपणा आल्याचे मला दिसले.

यावरच एक कविता मला स्फुरली होती. " रिती "
आपले आयुष्य हि एक मोठी वाटचाल. त्यात काही रस्ते सरळ काही सपाट, काही खाच खळग्यांचे, तर काही डोंगर उताराचे. तर काही गडांचे. अशाच एका गडावरची हि कविता

हा रितेपणा माझ्याही आयुष्याच्या एका टप्प्यावर मला भिववून गेला. त्यातून मी कशी बाहेर आले , कोणकोणत्या गोष्टी मी करत गेले त्याचे अनुभव तुमच्याशी शेअर करते. या सर्व गोष्टींनी मला शिकवले, " चल पुन्हा जागुयात ! "

लिखाण

मला आठवत ती त्या वर्षाची सुरुवात होती. अशाच एका मोकळ्या दुपारी माझ्या हातात एक नवी कोरी डायरी आली. अन मग कुठल्या कुठल्या जुन्या आठवणी त्यात लिहून काढायच्या असा विचार मनात आला. आणि जसे जमेल तसे मी लिहीत गेले. कधी गाणी, कधी कविता, चित्रविचित्र आठवणी, लहानपणीचे खेळ, सवंगडी, पाहिलेली गावे, माणसं, शाळेतल्या गमतीजमती , भांडणं, ...

खर तर अतिशय तुटक, विस्कळीत लिखाण होते ते. ना सलगता होती, ना काही साहित्यिक मुल्ये... पण मला मजा येत होती. टीव्ही समोर बसून दुस-यांच्या आयुष्यातील मालिका बघण्यापेक्षा मला माझ्याच आयुष्याचा रिपीट टेलिकास्ट बघायला, लिहायला अन वाचायलाही मजा येत होती.
लहानपणीचे, तरुणपणीचे कितीतरी प्रसंग मला पुन्हा आनंद देऊन गेले. काही सल काट्यासारखे सलायाचे , बोचायाचे पण ते लिहून टाकल्यामुळे थोडे सुसह्य होत गेले.

बरं हे मी जे लिहीत होते; ते कोणालाच वाचायला द्यायचे नव्हते. त्यामुळे माझ्या अनेक त्रुटी- चुका ही, मी बिनधास्त लिहित गेले. मी जे जे केले, वागले ते, त्या त्या वेळेची, परिस्थितीची गरज होती हे पुन्हा वाचताना लक्षात येत गेले. आणि मग मी मनातल्या मनात मलाच माफ करत गेले.
खरं सांगते, ही भावना फार फार महत्वाची असते; " आपण आपल्याला माफ करणं ! " आपण इतरांना एकवेळ माफ करतो पण स्व:ताबद्दल मात्र आपण फार कठोर होतो.

या लिखाणाने मला कितीतरी आनंद दिले. आई, बाबा इतकच नव्हे तर आजीवरही माझ्याकडून छान लेख लिहिले गेले. अनेकांनी ते वाचले आणि त्यांनाही ते खूप आवडले. माझ्यातल्या लेकीला, नातीला खूप समाधान देऊन गेले हे लिखाण

लिखाणाने मला मोकळे केले. आपण पण काहीतरी करू शकतो हा विश्वास दिला. बघा तुम्हीपण हा प्रयत्न करून बघा. आपल्याला वाटतं की मी काय लिहिणार? कसे लिहिणार? कोणी चेष्टा केली तर? पण हे लिखाण काही इतरांनी वाचावे म्हणून लिहिणार नाही. तुम्हाला मोकळे होण्यासाठी लिहा. अगदी लहानपणीच्या आठवणी लिहा. पुन्हा बालपणात पोहोचा, तेव्हाचा निर्वाज्य आनंद पुन्हा उपभोगा. कित्ती फ्रेश होऊन जाल . बघा पुन्हा जागून तर बघा !

प्राणायाम

मला व्यायामाचा खूप कंटाळा ! लहानपणापासून मी खूप खेळले. खोखो, लंगडी , कब्बड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन... त्यामुळे वेगळा व्यायाम त्या वेळी करावा लागला नाही.
नोकरी लागली तरीही बॅडमिंटन चालू होते. मग लग्न झाले, संसार सुरु झाला. अन मग खेळण्यासाठी वेळच उरला नाही. त्यामुळे शरीराचे चलनवलन फक्त घाई गडबडीत मर्यादित झाले. त्याचा परिणाम जाडी वाढण्यात झाला.

मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीने मला प्राणायाच्या क्लासला ओढून नेले. तिथे प्राणायाम शिकले तर खरी पण सातत्याने करणे झाले नाही. पण तरीही या प्राणायामाने ही मला पुन्हा जगायला शिकवले.

प्राणायामाचे जे बेसिक तत्व आहे की श्वासाकडे लक्ष देऊन, तो योग्य प्रकारे घेणे आणि सोडणे. हेही मला खूप आधार देऊन गेले. काय आहे माझा स्वभाव थोडा अती व्यवस्थितपणा, वेळेच्याबाबत अती काटेकोर असा आहे. गोष्टी नीट आणि योग्य पद्धतीनेच होण्या साठी मी खूप काटेकोर होते, आहे. पण याचाच मला फार त्रास होई. गोष्ट नीट, हवी तशी होत नाही म्हटल्यावर मी फार धडधड करून घेत असे.मग त्यातून धावपळ, ताण घेणे या आणि अशा घातक गोष्टी माझ्या स्वभावाच्या भाग बनू लागल्या. मग त्यातून चिडचिड, तडतड होऊ लागली. याचे पर्यावसान झाले ते माझ्या अर्धशिशी मध्ये, मायग्रेन मध्ये. एकदा मायग्रेनचा जबरदस्त अॅटॅक आला अन माझ्या मनात धोक्याची घंटा वाजली. अन मग माझे मलाच मी म्हटले, "अग जग अजून जराशी ! "

अन त्यावेळेस उपयोगी पडला हा प्राणायाम ! आता जेव्हा जेव्हा अशी ताणाची , धावपळीची, नैराश्याची परिस्थिती उद्भवते तेव्हा मी सगळे थांबवते. एक मोठ्ठा श्वास घेते. हळू हळू सोडते. मनावरचे सगळे ताण सुटत जातात. किती वेळ? फारतर १-२ मिनिट. पण तो पर्यंत मी पुन्हा मला सापडते. पुन्हा जगण्यासाठी ताजीतवानी होते. मनाला सांगत " चल, पुन्हा जागुयात "

आणखीन एक व्यायामाचा छोटासा प्रकार. जो मनाला खूप आधार देतो. अनेकदा आपल्याला वाटत की असं कोणीतरी हव ज्याच्या खांद्यावर मन टेकवावी. नेहमीच आजूबाजूला असं हक्काचं माणूस असेलच असं नाहीना. पण एक व्यक्ती नेहमी तुमच्याजवळ असतेच. कोण ? अहो तुम्ही स्वत:च स्मित

खोट, अशक्य वाटत ना? पण शक्य आहे. खरच. हात असलेल्या खुर्चीवर बसा. हात खुर्चीच्या हातावर सरळ ठेवा. आता डोळे मिटा. हळूहळू आपली मान सैल करा. अजिबात मुद्दाहून करू नका, फक्त मान हळूच एका खांद्यावर सोडून द्या. जसा जशी खाली जाईल तसा तशी जाऊ द्या, मुद्दाहून नका प्रयत्न करू फक्त सैल सोडा. तो खांदा वर नका उचलू. पलीकडच्या बाजूचा हात उचलला जाईल, तो उचलला जाऊ देत. बघा. टेकले ना डोके आपल्याच खांद्यावर स्मित आता तसेच हळू हळू मान सरळ करा. आता दुस-या खांद्यावर डोके हळूच सोडून द्या. बघा दोन दोन खांदे आहेत आपले डोके टेकवायला स्मित

" स्वत:चीच मान
ठेव आपुल्याच खांद्यावर
विश्वासाचा किती
सहजसाध्य आधार ! "

खरच सांगते इतके शांत, आश्वासक, प्रसन्न वाटते. आपल्यालाच आधार देत आपलेच मन आपल्याला सांगत असते " चल पुन्हा जागुयात ! "

छंद

तशी मी लहानपणापासून छांदिष्ट ! आई म्हणायची, " चित्र काढायला बसली की चित्रच काढेल. खेळायला लागली की तेच. पुस्तकं वाचायला लागली की झालं..." जोक्स अपार्ट या छंदांनी मला खूप आनंद दिला. एखादे विणकाम, त्याचे डिझाईन, एखादे चित्र, काढून झाले की ते बघण्याचा आनंद, आपल्या हाताने लावलेल्या झाडाला आलेले फुलं पाहण्याचा आनंद, हे सारे आपल्या बालाआलाच पाहिल्याचा आनंद पुन्हा देणारे. हे छंद आपल्याला आपल्या आजूबाजूचे सारे विसरायला लावतात. एका वेगळ्याच विश्वात आपल्याला नेतात. अगदी अनुभवावी अशी हि गोष्ट. मग हे छंद कोणतेही असोत. अगदी टीव्ही बघानायाचाही . फक्त त्यामागे निव्वळ वेळ जात नाही म्हणून बघू नका, तर आपल्याला आवडणारे कार्यक्रम बघा. मग असागी हाही छंद आपल्याला उभारी देणारा असतो. हे सगळे छंद आपल्याला सांगत जातात " चल पुन्हा जागुयात"

छुपा शत्रू

कधी कधी ना मला उगाचच कंटाळा येतो. बाहेर जायचा कंटाळा, स्वयापाकाचा कंटाळा, अगदी टीव्ही वरचा चॅनल बदलायाचाही कंटाळा. पण आता मला या छुप्या शत्रूला ओळखता येते. जरा जरी शंका आली की हा शत्रू शिरकाव करतोय, की मी झडझडून जागी होते. पहिली बसल्या जागेवरून उठते. तोंड धुते, कपडे बदलते, त्यातही आवडीचा ड्रेस घालते, शक्यतो, घराबाहेर पडते. बाहेर छोटी मुळे खेळत असतात, त्यांचा खेळ, उत्साह पाहून मलाही उत्साही वाटायला लागतं, आणि माझी मला मी म्हणते " चल पुन्हा जागुयात"

घरा बाहेर पडणे अगदीच शक्य नसेल तर घरातले राहून गेलेले काम करायला घेते.कपाट आवर, किचन ट्रॉली स्वच्छ कर, खिडक्यांच्या काचा पूस, जळमटे काढ,... अन मग माझा हा कंटाळा कुठच्या कुठे पळून जातो. स्वच्छ झालेल्या खिडकीच्या काचा मला बाहेरची हिरवाई दाखवू लागतात, कपाट आवरताना जुन्या वह्या, जुने कपडे बाहेर पडतात, जुन्या आठवणी फेर धरून नाचू लागतात अन मला म्हणू लागतात " चला पुन्हा जागुयात "

नवे मित्र

हल्ली नेहेमीच किंवा केव्हाही बोलायला कोणी मिळेलच असे सांगता येत नाही. कधी कधी वेळच अशी अडनिडी असते की गप्पा मारायला कोणी नसत्ते. मग अशा वेळेस मला सोबत मिळाली ती संगणकाची, नेटची. सुरुवातीला मलाही या कॉम्प्यूटरची भीती वाटायची. काही झाले तर, काही बिघडले तर , बंदच पडला तर ? तशात काँप्युटर, नेट वरती सगळी माहिती इंग्रजीतूनच असते असा एक गैरसमज होता. पण मी जसजशी काँप्युटर, नेट वापरत गेले तसतशी मला कळत गेले की असे काही नाही. मराठी मध्येही कित्येक गोष्टी इंटरनेटवरती आहेत. अनेक जण मराठीत आपापले ब्लॉग्ज लिहितात, अनेक साईट्स आहेत ज्यावर मराठीतूनच संवाद, लिखाण चालते. अनेक कथा, कादंब-या, कविता, नेट वरती आहेत. अनेक मराठी जुनी नाटकं, चित्रपट आहेत यु ट्यूब वर. अन मग हळूहळू माझी काँप्युटर अन इंटरनेटशी दोस्ती होत गेली. इतकी की आता माझ्या बहिणी, मैत्रिणी मला नेट सॅव्हि म्हणतात.
या दोस्तीतूनच माझे बरेच ब्लॉग्स तयार झाले, आई, बाबांचे ब्लॉग्स तयार झाले. काही मैत्रीणींचेही .
या दोस्तीने अजून एक नवीन द्वार माझ्यासाठी उघडले. ते म्हणजे ऑनलाईन विणकाम शिकवण्याचे. गेल्या वर्षभरात २०-२२ जणीं कॉम्प्यूटर-नेट यांच्या सहाय्याने ऑनलाईन विणकाम शिकल्या. अमेरिका, सिंगापूर, आफ्रिका, आणि भारतातील विविध राज्यातून अनेक जणी खूप सुंदर विणकाम करू लागल्या.
या सगळ्या विद्यार्थिनी कम मैत्रिणीं सोबत नेटाने मला म्हटले " चला पुन्हा जागुयात "

एक देणगी

याच काळात माझी एक खूप जवळची मैत्रीण शोभना, ने माझी ओळख "पुष्पौषधी " शी फ्लॉवर रेमिडी शी करून दिली. एका अडचणीच्या वेळेस या फ्लॉवर रेमिडीचा मला खूप उपयोग झाला. डॉ. बाख या जर्मन शास्त्रज्ञ यांनी ही थेरपी शोधून काढली.मुळात आपल्या मनातील नकारात्मक भावना नियंत्रण करण्यासाठी ही थेरपी खूपच उपयोगी पडते. मुळात कोणत्याही आजारात आपली सकारात्मक वृत्ती खूप परिणाम घडवत असते. ही सकारात्मक वृत्ती निर्माण करण्यासाठी फ्लॉवर रेमिडी अतिशय उपयुक्त ठरते. या फ्लॉवर रेमिडी नेही मला शिकवले, "चला पुन्हा जागुयात"

सुरुवात कवितेने केली होती तर शेवटही कवितेने करते.

गोधडी

2 comments:

  1. खुप सुंदर लिहिले आहेस गं.. खरेतर पुन्हा जगुया हे मलाही तितकेच अ‍ॅप्प्लिकेबल आहे. मीही इतक्या वर्षात ब-याच गोष्टी मागे टाकल्या, काही काही तर मला येत होत्या हेही विसरले. आता मीही परत विचार करतेय की खुप उशिर व्हायच्या आधीच आता परत सुरवात करायला हवी.

    शेवटी जाताना 'मला जे करायचे होते ते थोडे थोडे का होईना, मी करु शकले' हा आनंद मला सोबत हवाय :) 'अरेरे, हे करायचे होते, राहुन गेले..' ही हळहळ नकोय.. :)

    तु जे काही उपाय सांगितलेस ना ते अगदी उत्तम आहेत. सुरवात करुन बघतेच आता..

    ReplyDelete
  2. मनापासून धन्यवाद ग साधना :)
    प्रत्येकीला कधीना कधी यातून जावे लागतेच बहुदा ... प्रत्येकीची धडपड चालू असतेच. आपापला मार्ग एकमेकींशी शेअर केला की मजा येते , है ना :)

    ReplyDelete