Thursday, March 17, 2016

एकटेपण...!


त्यालाच एकटं रहायचं असतं 😏.
कित्ती जणांनी त्याला सोबतीला घेतलं, किती जणांनी त्याची आर्जवं केली.
ती राधा, बिचारी वाट पहातेच आहे यमुनेतिरी...
यशोदा बिचारी त्याची अंगडी टोपडी छातीशी लाऊन जगली , जगत राहिली...
रुक्मिणी, भामा अाणि कितीजणींना वाटलं तो आहे सोबत. पण तो कसला अडकतो.
ती विठाई, तिला वाटलं किमान या काळ्या रुपड्यात तरी सोबत राहिल, पण तीही बिचारी एकटीच विटेवर कधीची...
अर्जुन, त्याने तर सखा मानले त्याला. अगदी युद्धातही आपल्यासोबत सतत आहे असे वाटले. पण तिथेही कृष्णनीतीच. कृष्ण अलवार, लोण्यासारखा सगळ्यातून निसटून कधीच द्वारकेला पोहचला. अर्जून शेवटी भावंडांबरोबरच वाट चालला स्वर्गाची, तीही अयशस्वी. कुठे होता पार्थ वाट दाखवायला...
मीरा, ती तर मेरे तो गिरिधर गोपाल म्हणत वणवण फिरली. पण तिच्या नशिबी फक्त सावळ्याचा रंग, तोही फक्त शेवटी...
त्यालाच नकोय सोबत कोणाचीच...
सूरदासांपासून अगदी तुकयापर्यंत नाहीच जवळ केलं त्याने कोणालाच. नुसतीच हुलकावणी...
खट्याळपणा गेला कुठे त्याचा अजून. की खरे रूप नाही ओळखू येऊ म्हणून लपतोय तो? कोण जाणे. त्याचे त्यालाच माहिती...
जेव्हा भरून येईल हे एकटेपण त्याला;  तेव्हा असेल का पण थांबलेली राधा, यशोदा, रुक्मिणी, भामा, रखुमाई,अर्जून किंवा मीरा... किंवा तू, मी....
एकटे, एकटेच आपण. तू, मी अन तो ही...!

No comments:

Post a Comment